पुणे : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेच सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता दोन्ही बाजूच्या गटाकडून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शिरूरमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.
अजितदादा गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं आहे. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. अशी घणाघाती टिका मोहिते पाटलांनी शरद पवारांवर केलीय.
यावेळी दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तुम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असती तर शेतकरी चांगलाच सुखावला असता. त्यावर देशात कृषी खात्यामध्ये फार पुढे गेला आहे. देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे. कांदा निर्यात करायच्या वेळी निर्यात बंदी करण्यात आली. असं तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही झोपा काढत होता का ? असा सवाल जयंत पाटलांनी मोहिते पाटलांना केलाय. तर मोहिते सत्तेत जाण्यासाठी कसे लाचार झालेत आणि ते कसे महागद्दार आहे. हे सांगताना कोल्हेंनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या. याचा पाढाच वाचला.