सत्ताधारी पक्षातील लोकांकडून महापुरुषांविषयी केली जाणारी वादग्रस्त विधाने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली चिथावणीखोर वक्तव्ये या सर्व मुद्द्यांना घेऊन महाविकास आघाडीने महामोर्च्याचे आयोजन केले आहे. या अनेक मुद्द्यांचा निषेध करण्यासाठी आज (१७ डिसेंबर) रोजी मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “शिंदे सरकारचे महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडल्यामुळेच ते महापुरुषांचा अवमान सहन करत आहेत.” असे ते म्हणाले.
“आजच्या मोर्च्यातून घणाघात तर बसेलच; पण घणाघात होणार आहे. या कल्पनेने सरकारचे पाय लटपटू लागले आहेत. मोर्च्याला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली गेली. १३ अटी शर्ती लादल्या. महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. त्याविरोधात महाराष्ट्र प्रेमींचा स्वाभिमानासाठी हा मोर्चा आहे. त्याला तुम्ही अटी घालता? असे त्यांनी विचारले. हे करायचे नाही, इथे उभे राहायचे नाही, स्पीकर लावायचे नाही, भाषण लिहून द्या. पण, आता आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही. यांचे महाराष्ट्र प्रेम खोक्याखाली दाबले आहे.
“ज्या पिढींनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे मोर्चे पाहिले आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा मोर्चा पाहून तेव्हाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण, तेव्हाचे मोर्चे हे महाराष्ट्र प्रेमाने भारवलेले होते. आताही समस्त महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा निघाला आहे. तुम्ही लाचार, मिंधे असल्यामुळे महापुरुषांचा अपमान सहन करता. तुम्ही फक्त खोकी मोजत बसा. आम्ही अपमानाविरोधात लढत राहू.” असेही ते म्हणाले.