सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातलं शिंदे फडणवीस सरकार वाचलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात कायम राहिल्याने आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापुरातूनही अनेक जण इच्छुक असून मुख्यमंत्री शिंदेच्या ऐवजी कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विनय कोरे हे याचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत काहीशी अस्वस्थता आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेचे जिल्ह्यात एकमेव आमदार असलेले प्रकाश अबीटकर यांनी सेना वाढीसाठी आपल्यालाच मंत्रिपद मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. तर भाजपच्या गोटातून माजी मंत्री विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांनी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे.
विनय कोरे यांची फडणवीस यांच्याशी वाढती जवळीक असल्याने आणि सहकारात वारणा समूहाच्या माध्यमातून विनय कोरेंचा असलेला दबदबा पाहता तसेच चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय पाहता मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार समजले जात आहेत, तर आवडेंनीही तितकीच ताकद लावायला सुरूवात केली आहे. कोल्हापुरात शिंदे गटाचा राजेश क्षीरसागर सोडले तर तसा ताकदवान नेता कोणी नाही. त्यामुळे शिंदे इथे मंत्रिपद देऊन शिवसेना वाढीचे काम करणार की, मित्रपक्ष म्हणून भाजपला मंत्रिपद सोडणार हे आता पाहावे लागेल.