वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भाजपचेच असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर आज खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपूर वापरायला हवेत असा सल्ला दिला.आता राऊतांच्या सल्ल्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सांभाळून बोला हे मला ठाकरेंनी सांगितलं असतं तर तो मी सल्ला मानला असता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्यामुळे शिवशक्ती-भिमशक्ती युतीला चारच दिवस झालेले असताना युतीत ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
“देशात कोणतेही राजकीय पक्ष एकमेकांचे शत्रु होऊ शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण कोणताही भारतीय एकमेकांचा शत्रु होऊ शकत नाही. दोन राजकीय पक्षांमध्ये टोकाचे मतभेद असू शकतात पण शत्रुत्व अजिबात नाही. मनुस्मृतीच्या मुद्द्यावरुन आमचे भाजपासोबत टोकाचे मतभेद आहेत आणि ते राहतील. जर भाजपानं मनुस्मृतीची विचारधारा सोडण्याचा निर्णय घेतला तर आमचेही मतभेद टळतील”, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचे आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी आज सकाळी मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. “प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. शरद पवार यांनी प्रत्येकवेळी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. आजही विरोधी पक्षाच्या एकीचा आपण विचार करतो तेव्हा आपण शरद पवार यांचं नाव प्रामुख्याने घेतो. पवारच विरोधी पक्षांना एकत्र करण्याचं काम करतात. अशा वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जपून शब्द वापरले पाहिजे”, असा सल्ला संजय राऊत यांनी आंबेडकर यांना देऊ केला.