वेदान्ता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता ‘टाटा एअरबस’ हा मालवाहू विमान बांधणी करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. महाराष्ट्राला मिळणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यास सत्ताधारी कारणीभूत असल्याचे विरोधी पक्षनेते बोलत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी हे खापर विरोधी नेत्यांवर फोडत आहे. या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात भाष्य केले आहे.
“दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आले आहे. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे सर्व सत्य त्यातून समोर येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडले आहे. तसेच आम्ही राज्याच्या हितासाठी नवीन उद्योग आणत असून राज्यातील तरुणांना याचा फायदा होईल, राज्य स्वयंपूर्ण होईल. राज्य सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार असल्यामुळे राज्याच्या विकासासाठी निधी मिळत आहे. गेल्यावेळी प्रस्ताव पाठवला असता १४ हजार कोटी मंजूर करण्यात आले.” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
“वर्षभरात ७५ हजार रिक्त पदे भरली जातील. नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे. जपानच्या कंपनीने बीकेसीत २ हजार ६७ कोटींमध्ये जागा घेतली आहे. ते ५०० कोटी खर्च करणार आहेत. यामधून पाच ते सहा हजार लोकांना नोकऱ्या मिळतील. बीकेसीत विदेश गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.” अशी माहितीही त्यांनी दिली.