माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी हे जेव्हा चालतात त्यावेळेस सर्व महिला त्यांना मिठ्या मारतात त्यांच्या जवळ जातात. त्या महिला यांच्याकडे भाऊ म्हणून बघतात. आमचे नेते राजीव गांधी यांचा जीव त्यामुळे गेला. कारण एक महिला आली तिने राजीव गांधी यांना भावा समान मिठी मारली. राहुल गांधी यांचेही असेच आहे. परंतु नरेंद्र मोदी यांच्याबाबत असे घडेल का? अशा खरमरीत शब्दात सोलापूर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर प्रहार केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेत चालत होते. वयस्कर महिला तरुण महिला या राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिम्मत होईल का? राहुल गांधी यांच्याबद्दल बोलले जाते खरंतर हाच फरक आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला भेट देऊन मार्गदर्शन केले. केंद्र सरकार हे गोरगरिबांचे सरकार नाहीये. महिलांचे तर नाहीच नाही असा टोला सुद्धा प्रणिती शिंदे यांनी लगावला होता.