मुंबई, ठाणेसह रायगड जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. कोकणातील १८ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्वविदर्भाचा संपर्क तुटलेला आहे. विदर्भातील गोसेखुर्द आणि खान्देशातील गिरणा व हतनूर धरणातून विसर्ग सोडण्यात आला आहे. दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली आहे.
रायगड जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक, आपदा मित्र, प्रशासन सज्ज झाले आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री उशिरा दरड कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. यामध्ये १०० हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून एकूण आतापर्यंत २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरणात 74569 क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. धरणाचा पाणीसाठा 37.36 झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयना नगर 253 मीमी, नवजा 272 मीमी, महाबळेश्वर 331 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच रत्नागिरीत पावसाने थोडी उसंत घेतल्याने जिल्ह्यातील वाशिष्ठी, जगबुडी आणि अर्जुना या तीनही प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. जगबुडीची पातळी कमी झाली असली तरी अजूनही पाणी धोका पातळीपेक्षा अधिक आहे.