कसबा पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठीचा हेमंत रासनेंच्या उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टिळकांना उमेदवारी दिल्यास निवडणूक बिनविरोध करणार का?, असं म्हणत त्यांनी नाना पटोलेंना आव्हानं दिलं आहे. हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कसबा गणपती मंदिरासमोर भाजपकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीला कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही आहे. त्यामुळे टिळकांचं नाव वापरत आहेत. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की, जर टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर बिनविरोध करणार का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरलेला नाही, अशी टीका नाना पटोलेंनी केली होती.
नाना पटोले यांच्या या टीकेला थेट चंद्रकांत पाटलांनी आव्हान दिलं आहे. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचंच एकमत होत नाही आहे. चिंचवड मतदार संघात उमेदवारी लक्ष्मण जगतापांच्या कुटुंबात दिली आहे त्यामुळे चिंचवडमध्ये बिनविरोध निवडणूक होणार असं घोषित करुन टाका, असंही ते म्हणाले.तर दुसरीकडे आमदार मुक्ता टिळकांच्या कुटुंबीयांमध्ये उमेदवारी न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज झाल्याच्या कसबा मतदार संघात चर्चा सुरु आहे. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.