चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात गावागावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांचा कार्याचा एक भाऊ म्हणून मला अभिमान आहे. त्यामुळेच प्रशासनातर्फे रक्षाबंधनाच्या पर्वावर या कामाचे कौतुक म्हणून अकराशे रुपये रोख व साडी-चोळी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे मदत पुनर्वसनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौर्यात सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी ही माहिती दिली. गावागावांमध्ये घराघरात पोहोचून प्रशासनाला आरोग्यविषयक माहिती गोळा करून देण्यासाठी कोरोना सारख्या जोखमीच्या काळात आशाताईंनी अतिशय समर्पणाच्या भावनेतून काम केले आहे. या कामाची नोंद आणि या कामातूनच आजच्या दिवसापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रसार मर्यादित राहिला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही बाधित मृत्युमुखी पडलेल्या नाही. आरोग्य यंत्रणेच्या यशामध्ये आशाताईंचे श्रम विसरता कामा नये ,असेही त्यांनी सांगितले.
या महिन्यात रक्षाबंधनाचा भावा-बहिणीचा सण असून या पवित्र सणावर प्रत्येक आशा वर्करला सन्मानित करण्याचे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चित केले असून 3 ऑगस्टला यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील आशा वर्कर यांना सन्मानित करण्यात येईल.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातून जवळपास 65 हजार अन्य राज्यातील कामगार आपापल्या राज्यात गेले असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात असलेल्या उद्योग व्यवसायामध्ये अशावेळी कौशल्यपूर्ण कामगारांची गरज भासत आहे. याशिवाय वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कामगारांची आवश्यकता आहे. काही कामे कौशल्याची आहे. त्यामुळे अशा ठिकाणी महिनाभराचे प्रशिक्षण देऊन स्थानिक कामगारांना, सुशिक्षित बेरोजगारांना, भरती करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आज यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या सर्व खाणींच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली होती.