मुंबईसह राज्यभरात मागील दोन दिवसांपासून पाऊस तुफान बॅटींग करत आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, पुढील दोन दिवस राज्यातील पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना ऑरेंज जारी करण्यात आला आहे.शिवाय गडचिरोली जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे, तसेच कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी, राज्याच्या अनेक भागांत पावसाची संततधार कायम आहे. सततच्या या पावसामुळे नदी व नाले ओसंडून वाहत आहेत. दरम्यान, कोकणातही विविध ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात झाली. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत आहे. त्यामुळं राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमधील राधानगरी धरण 100 टक्के भरले आहे. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा आज पहाटे साडेपाच वाजता उघडला दरवाजा. या दरवाज्यातून प्रतिसेकंद 1428 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे. तर दुसरीकडे पॉवर हाऊसमधून 1600 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भोगावती नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.