सातारा | स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांचे पुत्र देखील राज्यात ठिकठिकाणी दौरे करीत आहेत. अमित ठाकरे यांनी मनसेचे विद्यार्थी संघटन मजबूत व्हावे, यासाठी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु आहे. दरम्यान, ‘कोकण, मराठवाडा, पुणेनंतर सातारा, कोल्हापूरचा दौरा सुरु आहे. या दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन पक्ष बांधणी सुरु आहे. सातारा जिल्ह्यात ही निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा निर्णय मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेच घेणार असल्याचे उत्तर अमित ठाकरे यांनी दिले.
अमित ठाकरे शनिवारपासून सातारा दौऱ्यावर आहेत. साताऱ्यातून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात केली. विश्रामगृहावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यात मनसेची पुर्नबांधणी सुरु आहे. साताऱ्यातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली तेव्हा अनेक प्रश्न समोर आले. ग्रामीण भागातील मुलींना शाळेला येण्यासाठी वेळेवर एसटी बस नाही. त्यामुळे मुलींना शिक्षण घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. . तसेच मुलींना महाविद्यालयातून पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्या थांबायला हव्यात, असेही ठाकरे म्हणाले.
पक्षाची बांधणी म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी म्हणायची का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. ”पक्षाची बांधणी सुरु असली तरी निवडणुका कधी होतील हे माहीत नाही. पण, सातारा जिल्ह्यात ही निवडणूक लढवायची की नाही हे राज ठाकरे ठरवणार असल्याचे ते म्हणाले. मात्र आता पक्षाची स्थिती पाहता काही निर्णय घेण्यात येतील. यामध्ये पक्षातून कोणाला काढण्याचा हेतू नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सक्रीय करण्याचा प्रयत्न सुरु आहे”, असे अमित ठाकरे म्हणाले.