२०२४ च्या लोकसभा निडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून सत्ताधारी पक्षाबरोबर विरोधकांनीसुद्धा सत्ताधारी भाजपाला सत्तेतून खाली खेचायला जोरदार मोर्चे बांधणी केली आहे अशातच आता पंतप्रधान मोदी यांनी कालझालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपा नेत्यांनी आणि खासदारांना मोलाचा सल्ला दिला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला ४०० दिवस शिल्लक आहेत. अतिआत्मविश्वासात राहू नका. मोदी येऊन जिंकून देतील, असा विचार करू नका. स्वत: समाजाच्या सर्व घटकांमध्ये जा आणि लोकांशी संवाद साधा.विरोधी पक्षाला कमकुवत समजण्याची चूक करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत उपस्थित खासदारांना दिला आहे.
तसेच या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ जून २०२४ पर्यंत वाढविण्यात आला. याचा अर्थ २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक भाजप नड्डा यांच्या नेतृत्वात लढणार आहे. कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पंतप्रधान मोदी यांच्या संबोधनानंतर समाप्त झाली. ते म्हणाले की, कोण कोणत्या जातीधर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कोणाला मत देणार आहे याची चिंता न करता प्रत्येक घटकांशी संवाद साधा.
पंतप्रधान मोदी यांनी वाचाळवीर नेत्यांना फटकारताना स्पष्ट केले की, आमच्या सरकारने कोणत्याही व्यक्तीला पंतप्रधान आवास योजनेत घर देताना, उज्ज्वला योजनेत गॅस देताना, आयुष्मान योजनेचे कार्ड देताना ही काळजी केली नाही की, ती व्यक्ती कोणत्या धर्माची, जातीची अथवा राजकीय पक्षाची आहे. ते कोणाला मत देतात, याचा विचार न करता समाजातील सर्व वर्गाला योजनांचा लाभ देण्याचे काम केले, पण या मेहनतीवर पक्षाचे काही वाचाळवीर नेते धर्म, जातीच्या नावावर वक्तव्ये करून त्यावर पाणी फेरण्याचे काम करतात. हिंदू-मुस्लीम करत वक्तव्ये करतात. राजकारणाची चिंता न करता, मतांची चिंता न करता समाजाच्या प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये जाऊन संवाद साधा असा साला त्यांनी यावेळी दिला.