मुंबई | शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या पक्षाच नाव आणि चिन्ह यांच्या संघर्षाचा शेवट केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शुक्रवारी झाला. शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार आहे.उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षप्रमुख पद लोकशाही तत्त्वाचे पालन करून तयार केलेले नव्हते, असे नमूद करून आयोगाने ठाकरे यांना जबरदस्त धक्का दिला.
यापूर्वी शिंदे यांच्या नेतृत्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष व त्यांचे ढाल- तलवार हे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा पक्ष व त्यांचे मशाल हे निवडणूक चिन्ह यांची मुदत केवळ चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने घटनेच्या ३२४ कलमांन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करत पक्षाचे नाव आणि चिन्ह यांचे वाटप केल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंकडून पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणं हे निवडणूक आयोगाचं काम नसल्याचे आंबेडकर म्हणाले. तसेच निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी यावेळी सांगितले.