नाशिक पदवीधर मतदारसंघातील जागेमुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. दुसरीकडे भाजपने त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. भाजप तांबे यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. त्यामुळे मोठा वाद काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाने तांबे यांच्यावर कारवाई करत, त्यांचे पक्षातून निलंबन केले आहे.
अशातच या सर्व घटनेवर डॉ. सुधीर तांबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाच्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना सुधीर तांबे म्हणाले की, पक्षाने चौकशी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ही चौकशी होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही. बाकी ज्या चर्चा सुरू आहेत. त्या सर्व निरर्थक आहेत. आता यावर काहीच बोलणार नाही. सध्या आम्ही निवडणूक प्रचारात व्यस्त आहोत. आमची भूमिका योग्य वेळी मांडणार आहोत”, असे बोलत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडण्यास नकार दिला.
यासोबतच त्यांनी एक ट्विटकरत देखील तांबे यांनी कारवाईवर भाष्य केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सुद्धा सुधीर तांबे यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे.