मुंबई | उद्धव ठाकरे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर मी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तसेच शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्यावर पक्षप्रवेशाचे खापर फोडले.
गोऱ्हे यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. नीलम गोऱ्हे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर अत्यंत कठोर आणि जळजळीत शब्दात टीका केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. लाज वाटते मला. पाचवेळा आमदारकी दिली. अजून चालू आहे. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे असे संतापजनक विधान राऊत यांनी यावेळी केले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, पाच पाच वेळा ज्यांना आमदारकी मिळाली, महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना सुरुवातीला मिळालं. विधान परिषदेचं उपसभापतीपद दिलं. एवढं दिल्यानंतरही एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल, कारणं काही असेल… विकास असेल, अन्याय असेल. तर मला त्यांची लाज वाटते.
महाराष्ट्रालाही त्यांना लाज वाटते. ज्या विचारसरणीतून त्या आल्या तरीही त्यांना जे जे हवं ते दिलं. पण चारपाच महिन्यासाठी कुणी पद राहावं म्हणून कोणी अशा प्रकारची बेईमानी करत असतील तर त्यांना आम्ही राजकीय श्रद्धांजली वाहतोय, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.