राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्नीसह दोन दिवसांसाठी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड केल्याचे पाहायला मिळालं. त्यांनी पाच हजार केळींच्या झाडांची लागवड केली. तसेच नारळाच्या झाडांची देखील लागवड केली. मला शेतीची आवड आहे. मी प्रत्येक वेळी आलो की झाडे वाढवतो असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्नी लताताई शिंदे या देखील शेतात उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मला शेतीची आवड आहे. मी हमेशा शेताकडे येत असते. गेल्या वेळेस हळदीच्या झाडांची लागवड केली होती. यावेळेस केळीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. माझ्या मुलाला तसेच साहेबांना देखील शेतीची आवड असल्याची माहिती लताताई शिंदे यांनी दिली.
कोयना धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. हा गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या कामाचा शुभारंभ देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी कोयनेच्या पात्रातून फेरफटका मारला. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्ती शेती करण्याचे धोरणं अवलंबल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. धरणातील गाळ शेतीसाठी उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे अनेक ग्रामस्थ समस्या घेऊन तसेच त्यांची कामे घेऊन आले होते. त्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या.
एकनाथ शिंदे यांची दरे या गावी शेती आहे. दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. या शेतामध्ये त्यांनी आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, मोसंबी, सफरचंद, नारळ, केली या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ते गावातील शेतीत रमतात. आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून त्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसीत केली आहे.