सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील रेठरे हरणाक्ष येथील एका शेतकऱ्याने पुरग्रस्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान जमा खात्यात जमा झाल्यानंतर लावलेल्या फलकाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा फोटो असलेला बॅनर लावल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.
या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू शेट्टी यांच्या फोटोसह एकदम ओके पन्नास हजार रुपये जाहीर आभार असा आशयाचा फलक लावल्याने शेतकरी वर्गामध्ये चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियमित कर्जधारकांना पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले होते. सरकार संकटात असताना घाई गडबडीत याची घोषणा करण्यात आली होती, पण ती फक्त घोषणा राहिली होती.
राजू शेट्टी यांनी परिक्रमा पंचगंगेची ही यात्रा प्रयाग चिखली ते नृसिंहवाडी ही दीडशे किलोमीटर अंतराची पायी यात्रा काढून सुध्दा सरकार दखल घेत नव्हते, त्यावेळी महाविकास आघाडीच्या सरकारने 150 रूपये प्रती गुंठा देऊन पुरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यानंतर 13 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरवर भर पावसात मोर्चा काढण्यात आला होता.
त्या मोर्चाची दखल शिंदे सरकारने दखल घेत दिवाळीपूर्वी अनुदान जमा करण्याचे आश्वासन दिले होतं. कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जमा झाले आहे. यामुळे राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आले आहे, अशी चर्चा या बॅनरमुळे तालुक्यात सुरू झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राजू शेट्टी यांची ऊस परिषद जयसिंगपूरमध्ये 15 ऑक्टोबरला पार पडली. चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करा, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत 13 ठराव मंजूर करण्यात आले.