एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नवीन परीक्षा प्रणाली २०२४ ऐवजी २०२५ पासून लागू करावी, या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भेट घेतली. तसेच त्याच ठिकाणाहून त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना फोन लगावला होता तसेच या भेटीनंतर शरद पवारांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून हे आंदोलन मागे घ्यायला लावले.
तसेच विद्यार्थ्यांची एक समिती करून या समिती सोबत शरद पवार स्वतः मुख्यमंत्र्यांना या प्रश्न भेटतील, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र शरद पवार यांच्या या शिष्टाईबाबत भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत 80 वर्षाचा एक योद्धा रणांगणात उतरला आहे, अशा पद्धतीचे चित्र पुण्यात निर्माण करण्यात आले. वास्तविक केवळ राजकीय विरोधासाठी आणि सरकारच्या विरोधात काहीतरी मुद्दा हवा, म्हणून शरद पवार या आंदोलनात उतरले आहेत.
पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, शरद पवार यांनी केलेली ही केवळ नौटंकी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. पवारांना जर प्रश्न सोडवायचे असते तर त्यांनी यापूर्वीच अनेक प्रश्नांमध्ये लक्ष घातले असते. ज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कधीही पवार थेट भिडताना दिसत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. एसटी कर्मचारी त्यांच्या घरापर्यंत धडकले. त्यावेळी ही शरद पवार यांनी त्यांच्या प्रश्नांमध्ये कोणतेही लक्ष घातले नाही असे प्रश्न दरेकरांनी उपस्थित केले होते.