पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास भाई कदम यांनी मातोश्रीवर निशाणा साधला आहे. २००९ मध्ये मला कुणी पाडलं. मला कुणी आव्हान दिलं होतं? माझा पराभव होण्यासाठी मातोश्रीतल्या एका नेत्याने आदेश दिला होता, यासगळ्यांचा खुलासा मी लवकरच करणार आहे. माझ्या पुढच्या सभेत यासंदर्भातला गौप्यस्फोट करेन, अशी माहिती बंडखोर नेते रामदास कदम यांनी दिली आहे. आता त्यांच्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकानात खळबळ उडाली आहे.
खेड येथे काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली. माझ्या राजकीय मुस्कटदाबीसाठी मातोश्रीतून प्रयत्न सुरु होते, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. कोकणातील ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या मतदारसंघ गुहागर येथील 10 सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी रामदास कदम यांनी कोकणातील शिवसेनेवर भाष्य केलं. तर उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी कशा प्रकारे राजकारण केलं, यावरून जोरदार टीका केली.
2009 मध्ये मातोश्रीतून मला पाडण्यासाठी कुणी आदेश दिला होता? मातोश्रीनेच मला पाडलं का? हे तुम्हाला लवकरच मी जाहीर सभेत बोलणार आहे. मातोश्रीतल्याच एका नेत्याने असा आदेश दिला होता… असं रामदास कदम म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार शिंदे गटाच्या आमदारांवर खोक्यांचे आरोप करत आहेत. त्यावरून रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ उद्धवजींनी खोके-ओके काहीही बोलू दे. 40 आमदारांना विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर खोके दिले जात आहेत. त्यामुळे ते निवडून येणार आहेत. आज ते एकनाथ शिंदेंनी बंड केलं नसतं, हा बदल झाला नसता तर उद्धव ठाकरेंनी मातोश्री सोडली नसती. अजितदादांनी त्यांच्या माजी आमदारांना ताकद देणं थांबवलं नसतं. यातला एकही आमदार निवडून आला नसता.