मुंबई | राज्यात महाविकास आघाडी जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र या विस्तारात अनेकांना डावलले गेले. यात अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर त्यांनी स्वत: भाष्य केलं आहे. 15 सप्टेंबरच्या आत मंत्रीमंडळ विस्तार होईल असं म्हणत बच्चू कडू यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचं म्हटलं आहे.
बच्चू कडू आज पावसाळी अधिवेशनात बोलत होते. फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, माझा देखील फोन टॅप झाला होता. मी गांजा तस्करी करतो म्हणून फोन टॅप करण्यात आला होता. याबाबत आरोप झाले परंतु मला कोणाच्या क्लीन चीटची गरज नाही. मी देखील शरण जाणार नाही. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी काही केलं नसेल तर शरण जाण्याची गरज नाही, असं ते म्हणाले.
पुढे बच्चू कडू म्हणाले की, कामानिमित्त बाहेर असल्याने मी काल येऊ शकलो नव्हतो. नाराज आहे म्हणून न येण्याचं काही कारण नाही. नाराजी असली तरी ती सभागृहात दाखवण्यात अर्थ नाही. मी याआधीही बोललो आहे की, व्यक्तिगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे असून त्यासंबंधी लढा सुरु राहील, असंही कडू यांनी यावेळी बोलून दाखविले होते.