मुंबई : आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेले आणि तत्कालीन महविकास आघाडी बरोबर झालेल्या वादामुळे प्रकाश झोतात आलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पुन्हा एकदा राजभवनात दिसणार आहेत. ते 6 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कोश्यारी यांचं नुकतंच डेहराडूनवरून मुंबईत आगमन झालं आहे. 16 ते 21 मे दरम्यान कोश्यारी यांचा राजभवनात मुक्काम असणार आहे. ते 17 मे ते 20 मे दरम्यान नियोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे कोश्यारी राज्यातील काही डॉक्टरांना देखील भेटणार आहेत. कोश्यारी यांचा हा महाराष्ट्र दौरा चांगलाच चर्चेत आला आहे.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल असताना ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तसेच तत्कालीन आघाडी सरकार बरोबर झालेल्या वादावादीमुळे कायमच चर्चेत राहिले. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे विरोधक चांगेलेच आक्रमक झाले. त्यांनी कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. शेवटी कोश्यारी यांनीच राजीनाम्याची इच्छा व्यक्त करत, आपला राजीनामा दिला.
मागच्या गेल्या आठवड्यात राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. या निकालावेळी सुप्रीम कोर्टाकडून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. राज्यापालांनी सत्तास्थापनेसाठी दिलेलं निमंत्रण हे घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. तसेच शिंदे गटाकडून भरत गोगावले यांची प्रतोत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती देखील घटाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.