Latest Marathi News

BREAKING NEWS

‘महाराष्ट्राचे 3 तुकडे करण्याचा दिल्लीचा विचार’, ‘सामना’मधून हल्लाबोल!

0

 

 

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दोघांनी शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसंच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्लीवारीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या संपादकीयमधून हल्लाबोल करण्यात आला आहे. ‘मुंबईविरोधात दिल्लीचे कारस्थान कसे उधळून लावणार, यावर ठोस काय ते सांगा’ असा सवाल या संपादकीयमध्ये विचारण्यात आला आहे.

 

त्याचबरोबर राज्याचे 3 तुकडे करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे, असा आरोपही यामध्ये करण्यात आलाय. ‘सामना’मधून हल्लाबोल ‘महाराष्ट्रावर आता पैशांचा पाऊस पडेल, हात पुढे केला की हवे ते मिळेल. कारण महाराष्ट्रात दिल्लीच्या मनाप्रमाणे घडले आहे व श्री. शिंदे व त्यांच्या लोकांनी दिल्लीस हवे तसे करून दिले आहे. प्रश्न राहता राहिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा व अखंडतेचा. महाराष्ट्राचे तीन तुकडे करून तीन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा विचार दिल्लीच्या मनात आहे व त्याची लवकरच अंमलबजावणी होईल, असे कर्नाटकातील भाजपचे मंत्री जाहीरपणे बोलतात. त्यावर ना मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ना नागपूरकर उपमुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका!

 

तसेच महाराष्ट्र तोडण्याच्या केंद्रीय योजनेस या दोघांचा छुपा पाठिंबा तर नाही ना? या शंकेला वाव मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले. आता मुख्यमंत्री स्वतः दिल्लीस निघाले. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून हे राज्य ‘मराठी’ माणसाने मिळवले. आजचे सरकार आले तसे हे राज्य हवेतून पडले नाही. मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी मराठी माणसांना रस्त्यावर मोठा संघर्ष करावा लागला. त्यामुळे हुतात्म्यांना फक्त पुष्पचक्र वाहून औपचारिकता पूर्ण केल्याचे समाधान नको. मुंबईविरोधात दिल्लीचे कारस्थान कसे उधळून लावणार, यावर ठोस काय ते सांगा.

 

आज पंतप्रधानांची भेट घेणार मुख्यमंत्री ‘मुंबईच्या बाबतीत सध्या दिल्लीचा विचार बरा नाही. मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी सध्या दिल्लीकर सोडत नाहीत. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून गुजरातला नेले व त्याचे समर्थन श्री. फडणवीस करतात. मुख्यमंत्री शिंदे हे स्वतःस शिवसैनिक समजतात. फडणवीसांच्या भूमिकेस त्यांचा पाठिंबा आहे काय? मुंबईतील अनेक केंद्र सरकारी कार्यालये इतर राज्यांत हलवली. एअर इंडियाचे मुख्यालयही नेले, असे बरेच काही पडद्यामागे घडते आहे. शिवसेना या सगळ्यांविरुद्ध सर्वच पातळ्यांवर आवाज उठवीत राहिली. कारण हाच आवाज महाराष्ट्राचा आहे व राहील! मुख्यमंत्री शिंदे यांना या सगळ्या विषयांवर भूमिका घ्यावी लागेल. ते दिल्लीस निघाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.