महाआरोग्य शिबिर मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होणार असून सर्वसामान्यांचा आजारपणामुळे होणारा आर्थिक भार थोडासा हलका करण्याच्या दृष्टीने महा आरोग्य मेळावा महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिपादन केले. या महाआरोग्य मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री आणि उद्योग मंत्री सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील दामले विद्यालय येथे हे महाशिबिर आयोजित केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील दामले विद्यालयात गुरुवारी महाआरोग्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये तसेच संबंधित विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यात हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ५०० मोफत दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. या महामेळाव्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांना यावेळी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.