‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो असून, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचं विधान राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. यावरूनच अनेक नेते त्यांच्यावर टीका करत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कोश्यारींची होशियारी? असं म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाराष्ट्राचा इतिहास माहित नसेल तर बोलू नका, असं देखील ते म्हणाले आहेत.
कोश्यारी यांच्यावर टीका करत राज ठाकरे म्हणाले आहेत की, आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल, तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे. म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?, असं ते म्हणाले आहेत. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो.