केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निकालानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ठाकरे गटाला यांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना आणि पक्षचिन्हासाठी आता ठाकरे न्यायालयीन लढा देत आहे.
आज सकाळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा झाली. शिवसेना नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ही चर्चा झाली आहे.यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये कायदेशीर बाबींबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णया विरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याचिका दाखल करणार आहेत. त्या प्राश्वभूमीवर ही चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.
या निर्णयानंतर ठाकरे गटामध्ये कमालीची अस्वस्था पसरली आहे. आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने आता आपल्या ट्वीटर अकाऊंट आणि वेबसाईटवरून धनुष्यबाण चिन्ह हटवलं आहे. उद्धव ठाकरे गटाने नाव आणि धनुष्यबाण गमावल्यानंतर आता पक्षकार्यालय आणि इतर ठिकाणावरून नाव आणि चिन्ह बदलण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट आणि पक्षाच्या वेबसाईटवरून धनुष्यबाण चिन्ह डिलीट केलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही फार परिणाम होत नसतो.काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला. काँग्रेसचं गाय-वासरू चिन्ह होतं, पण त्यांनी पंजा घेतला, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही, कारी दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील,’ असं म्हणत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.