Latest Marathi News

BREAKING NEWS

कर्नाटकच्या निकालावरून राज ठाकरे-आशिष शेलारांमध्ये शाब्दिक चकमक

0

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. काँग्रेसच्या या विजयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. हा पराभव भाजपच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा आहे. विरोधी पक्ष हा जिंकत नसतो तर सत्ताधारी हरत असतात, आपलं कोण वाकडं करू शकतो? अशा विचाराचा जो असतो, त्याचा हा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नये, हा बोध या निकालातून सगळ्यांनी घ्यावा, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या या टीकेवर आशिष शेलार यांनी पलटवार केला. ‘घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जालंधरमध्ये आम आदमी पार्टी का जिंकली आणि काँग्रेस का हरली? राहुल गांधींची भारत जोडो यात्रा जालंधरमध्ये चालली नाही का? उत्तर प्रदेशमधल्या सगळ्या नगर पालिका महानगरपालिका महापौर निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं, त्या राहुल गांधींची भारत जोडो यात्रा कुठे गेली होती? त्यावर राज ठाकरे बोलतील का?, त्यामुळे मै भी जिंदा हूं, हे दाखवण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया आहे, त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व आम्ही देत नाही,’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार यांच्या या टीकेला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘यांचं अस्तित्व मुळात मोदींवरती आहे, यांना नाहीतर खाली कोण ओळखतं? यांच्या फारश्या बोलण्याला वाटेला मी जात नाही. छोटी माणसं आहेत. ज्यांना पोचच नसते त्यांना या गोष्टी सुचू शकतात. ही कोण लोक आहेत? निवडणूक आली की नाक्यावर जाऊन सभा घेणारी लोक असतात. काही गोष्टी विरोधकाच्या जरी असल्या ना तरी मान्य करायला पाहिजेत. तशाप्रकारचं मोठेपण नरेंद्र मोदी करू शकतात तर त्यांच्या पक्षातल्या खालच्या लोकांना कार्यकर्त्यांना कळल्या पाहिजेत अस म्हणत थेट आशिष शेलारांना टोला लगावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.