आतापर्यंत ज्यांना मी मोठं समजत होतो, त्यांना जवळून पाहिल्यानंतर खूप लहान वाटले, असं वक्तव्य केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेल्या नितीन गडकरी यांनी दिल्लीतील नेत्यांसंदर्भात हे वक्तव्य केलंय का, यावरून चर्चा सुरु झाली आहे.
नितीन गडकरी यांनी केलेलं हे वक्तव्य मुंबईतलं आहे. मुंबई आयआयटीमध्ये गडकरी शनिवारी एका कार्यक्रमाला उपस्थित होते. नेहमीप्रमाणे गडकरी यांनी या भाषणातही तुफान फटकेबाजी केली.आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नितीन गडकरी यांनी भारतातील मूल्यशिक्षण व्यवस्थेचं कौतुक केलं. शिक्षणासोबतच मूल्य किती आवश्यक असतात, याचं महत्त्व सांगितलं.
पदवी घेतल्यामुळे तुम्ही फक्त सुशिक्षित होता. पण सुसंस्कारी होत नाहीत. संस्कार असले तरच माणसे परस्परांशी चांगले वागतात. राजकारणात ह्युमन रिलेशनशिप अत्यंत महत्त्वाची असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. प्रामाणिकपणा हादेखील अत्यंत महत्त्वाचा गुण आहे, असं वक्तव्य गडकरी यांनी केलं. यावेळी त्यांनी दिल्लीतला अनुभव सांगितला.