कसबा आणि चिंचवडच्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले आहे. तसेच मतदानाचा कालचा दिवस भाजप आणि महाविकास आघाडीच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. दरम्यान, आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे यामध्ये महागाई, बेरोजगारी, हे मुद्दे चांगलेच गाजणार आहेत. त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी शिंद-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी पुणे पोटनिवडणूकीच्या मुद्द्यावरुनही भाजपवर जोरदार निशाणा साधला.
नाना पटोले म्हणाले, असे वाटले होते की, राज्य सरकार शेतकऱ्यांना धीर देईल; परंतु हेच सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. हे सरकार राज्यपालांकडून स्वतःची पाठ थोपवून घेत आहेत. कापूस उत्पादक, कांदा उत्पादक, तूर उत्पादक सर्वच त्रस्त आहेत. हे ईडी सरकार फक्त शेतकऱ्यांच्या टाळू वरचे लोणी खाणारे आहेत, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, पुण्यातील पोटनिवडणुकीवर बोलताना पटोले म्हणाले, या पोटनिवडनुकीत आमचे दोन्ही उमेदवार नक्की निवडून येतील. भाजपने तर निव्वळ पैसे वाटून मारपीट करून प्रचार केला आहे.
सध्या महाराष्ट्रात विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असून देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू आहे आणि यामुळे याबाबतचा विरोध करण्यासाठी लोक पुढे येत आहेत, असेदेखील नाना पटोले म्हणाले. दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.