काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यादरम्यान त्यांनी केंद्रासह राज्यातील भाजप नेत्यांसोबत वारंवार होणाऱ्या भेटीगाठीही वाढवल्या आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये वेश करणार, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र कोल्हे यांनी या चर्चा फेटाळल्या. अशातच अमोल कोल्हे यांनी आज केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु झाल्या.
जोपर्यंत गती आहे तोपर्यंत चक्र एकाच दिशेने भासतात, पण गती कमी होताच कळतं दिशाच वेगळ्या आहेत. याला निसर्गाचा नियम म्हणायचे की सगळीकडेच असे असते? आयुष्य, करिअर, राजकारण…गती कमी झाल्यानंतर दिशा कळते, अशा कॅप्शनसह कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आता या शेअर केलेल्या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे
खासदार म्हणून संसदेत निवडून गेल्यानंतर वारंवार केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडणारे अमोल कोल्हे हे मागील काही महिन्यांपासून विविध भाजप नेत्यांची भेटीगाठी घेत असल्याचे दिसून आले. . कोल्हे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तसंच पुढील राजकीय प्रवासाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, एक गोष्ट पक्की ठाऊक आहे की शेतकरी उगाच औत खांद्यावर घेऊन हिंडत नाही, वारा आणि आभाळ बघून गणित बांधायचे असतं आणि मग वावर नांगरायला घ्यायचं असते, असे विधान कोल्हे यांनी केले होते.