राज्यात एकनाथ शिंदेंचे सरकार आल्यानंतर भाजपेत्तर पक्ष त्याला निशाणा करत आहेत. आता राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्यातील सध्याचे सरकार विमानातून प्रवास करत आहे, मोठ्या मोठ्या हॉटेलात बसत आहे, अन् अडीच हजाराची दाढी, कटींग करत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी एकनाथ शिंदे सरकराला टोला लगावला आहे.
सुळे पुण्यातील प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिराला भेट देण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी देव दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात भिषण परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहे. ह्या सरकारला शेतकऱ्यांची काही पडलेली नाही. हे सरकार फाईव्ह स्टार हॉटेलांमध्ये अडीच अडीच हजार रुपयांच्या दाढ्या करत आहे. एका विमानातून उतरुन दुसऱ्या विमानात बसतंय. यांना शेतकऱ्यांशी काही देणं-घेणं नाही. हे सरकार असंवेदनशील आहे, असा घणाघात सुप्रिया सुळेंनी केला.
हे लोक सुरत, गुवाहाटी, गोवा फिरुन आले. भारतगमन करुन आले. बाहेरील राज्यातील पोलीस आपल्या आमदारांना ज्या पद्धतीने हाताळत आहेत. ते अत्यंत दुर्देवी आहे. जनतेचे सेवक असल्याचे हे आमदार सांगत होते. पण, आता स्वार्थ लपून राहीलेला नाही. हे सरकार अस्थिर असून खरे रुप लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उत्तरअधिकरी ठरवला होता. आता शिवसेनेच्या आमदारांकडून त्यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांना दुखावले जात आहे. उद्धव यांना दुखावणे म्हणजे बाळासाहेबांना दुखावण्यासारखे आहे. शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे आणि आम्ही कायम त्यांच्यासोबत राहू, असे सुळे म्हणाल्या.