गुजरात विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षाची विजयाकडे वाटचाल होतांना दिसत आहे. भाजपाच्या या यशावर महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंद व्यक्त करत गुजरातच्या जनतेचे आभार व्यक्त केले. गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसला धूळ चारली आहे. या निवडणुकीती काँग्रेसच्या अनेक मतबल नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
बावनकुळे म्हणाले की, मी याआधीही सांगितले होते राहुल गांधी कधीच नेतृत्व करू शकत नाहीत. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस कधीच जिंकू शकत नाही. त्यासाठी मोदींसारखं स्वत:ला देशाला समर्पित करावं लागतं. पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासासाठी स्वत:ला देशाला समर्पित केले आहे, असे बावनकुळे म्हणाले तसेच असाच विजय येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्ही मिळवू असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
गुजरातच्या जनतेने मोदींवरचा विश्वास कायम ठेवला आहे. इतकेच नाही, तर यावेळीचे यश गुजरात निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठं यश ठरताना दिसत आहे. जगात भारताला महाशक्तीशाली बनवण्याच्या मोदींच्या प्रयत्नांचे हे यश आहे. गुजरातमध्ये भाजपानं केलेल्या कामांना जनतेनं दिलेली ही पोचपावती आहे. आता तरी या निकालातून विरोधकांचे डोळे उघडतील,असे बावनकुळे म्हणाले.