अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र ते केवळ चित्रपटांसाठीच नाही तर त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नानांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केले होते . शिवसेना वेगळी झाली आणि शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले पण त्यामुळे आमची कुटुंबदेखील विभागली गेली असे वक्तव्य त्यांनी केले होतं. आता पुन्हा एकदा त्यांचे हे वक्तव्य नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
जवळपास एक महिन्याअगोदर एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नाना यांनी शिंदे- ठाकरे राजकारणावर परखड मत मांडले. शिवसेना विभागली गेल्यानंतर आमची घरंदेखील विभागली गेली. माझी भावंडं, मुलं किंवा वडिलधाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. ही भांडणं तिथपर्यंत गेली आहेत.’ नुकतेच खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर ठाकरे गटात आहेत. यानंतर पासून पुन्हा नाना यांचे हे विधान चर्चेत आले.
तसेच ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांचे पूर्वाश्रमीचे पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशी एक दोन नाही तर अनेक उदाहरणं देता येतील. ही फक्त राजकारणातील नावं असली तरी घरोघरी, गल्लोगल्लीदेखील आता दोन गट पडले असे चित्र दिसत आहे. ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर आता नाना पाटेकर यांचे ते वक्तव्य तंतोतंत जुळताना दिसत आहे.आता नाना पाटेकर यांच्या या विधानावर दोन्ही गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.