धाराशिव: धाराशिव हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आतापर्यंत राहिलेला आहे. याठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माझा धाराशीवच्या जनतेवर पुर्ण विश्वास आहे. कारण तिकीट देणारे नेते असले तरीपण मत देणारी ही जनता मायबाप आमची आहे. त्यांच्याच जोरावर आम्ही याठिकाणी निवडून येत असतो असं म्हणत शिवसेना शिंदे गटातील आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारात केलाय. यावेळी भाजप नेते राणा जगजितसिंग पाटील, बसवराज पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, “धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या वतीने 26 जानेवारी 2024 पासूनच प्रचाराला सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर धाराशिवमधील अनेक नेते, आमदार, मुख्यमंत्री ,दोन उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी मिळून येथील उमेदवार निवडला. मात्र तरी देखील हा हाडाचा शिवसैनिक खचला नाही. कोणत्याही जय पराजयाने खचणारा हा शिवसैनिक नाही. म्हणूनच आजपर्यंत धाराशिव जिल्हा हा कडवट शिवसैनिकांचा म्हणून ओळखला जातो.
कोणा पुढेही झुकणार नाही असा हा शिवसैनिकांचा बाणा आहे. शिवसैनिकापेक्षा कोणतेही पद मोठे नाही, हे बाळासाहेबांची एक शिकवण आम्हाला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये मतदान मशीनमध्ये धनुष्यबाण नसला तरी आम्ही प्राणपणाने महायुतीच्या उमेदवारांसाठी जीवाचे रान करणार, असंही तानाजी सावंत यांनी म्हणाले.
दरम्यान, मागील 2014 ते 2024 पर्यंत जो भारतात विकास झाला तो नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. घड्याळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून अर्चना पाटलांना विजयी करा असे आवाहन सावंत यांनी केले.