काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात. तर कधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा करतात. तरीही राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊले उचलले जात नाही. हे पाहता विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.दिल्लीतील अदृश्य हात महाराष्ट्राविरोधात षडयंत्र करत असल्यामुळे राज्यपाल, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि बसवराज बोम्मई यांची महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेने बघण्याची मजल जात असल्याची टीका सुळे यांनी केली.
तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केल्या आहे. या गोष्टी ठरवून केल्या जात असून महाराष्ट्राविरोधात दिल्लीत मोठे षडयंत्र होत असल्याचा घणाघात सुळे यांनी केला. आमचं सरकार असताना महाराष्ट्रातील गावांविषयी किंवा इतर गोष्टी बोलल्या जात नव्हत्या मात्र आताच्या काळात अशी वक्तव्य करण्याची हिम्मत कशी काय होते असा सवालही सुळे यांनी उपस्थित केला.