विधान परिषदेच्या 10 जागांसाठी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेवून भाजपला मतदान केल्याचं धक्कादायक विधान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या मुलाखतीत याबाबतचं स्पष्ट विधान केलेलं नाही. पण विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी आर्थिक व्यवहार झाले आहेत, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात भरपूर काहीतरी भयानक घडतंय हे मात्र निश्चित आहे. “या प्रकरणी मी कारवाईची मागणी केली होती.
चंद्रकांत हांडोरे या आमच्या सहकाऱ्यावर अन्याय झाला होता. त्यामुळे ज्यांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे त्यांच्यावर कारवाई करायला हवी. अशी देखील शंका आहे की, यामधे आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्यामुळे समिती नेमण्यात आली.अहवाल देखील समितीने पक्षाच्या नेतृत्वाला पाठवला आहे. आम्ही देखील काय करवाई होतेय याची वाट पाहत आहोत”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना सांगितलं आहे.