चांदणी चौकाचा प्रलंबित प्रश्न सोडवून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करून दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मानले नितीन गडकरींचे आभार
पुणे : पश्चिम पुण्याचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या चांदणी चौक परिसरातील बहुप्रतीक्षित चांदणी चौक उड्डाणपूल, खेड व मंचर वळण रस्त्याचे बांधकाम (चौपदरीकरण) चे लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.
यावेळी चांदणी चौकाचा प्रलंबित प्रश्न सोडवून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करून दिल्याबद्दल पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आभार मानले तसेच एनडीए चौकातील एकात्मिक सुविधा प्रकल्प मुंबईहून बंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांना उपयुक्त ठरण्यासोबत शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास उपयुक्त ठरणार आहे. शहरात मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ६ पासून मेट्रोची फेरी सुरू केल्यास सकाळी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होईल. राज्यात १८ हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग झाले आहेत, असे हि त्यांनी सांगितले.
येथे होणाऱ्या वाहतूकमुळे कोंडी ऑगस्ट २०१७ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलेला हा प्रकल्प भूसंपादनातील येणाऱ्या अडथळ्यामुळे २ वर्ष रखडला होता. २०१९ मध्ये पुन्हा या कामाला सुरूवात झाली. वर्षी चांदणी चौकातील जुना पूल देखील पाडण्यात पाडण्यात आला होता.
यावेळी गडकरी म्हणाले १६.९८ किमी लांबीच्या व ८६५ कोटी रुपए किंमतीच्या या पुलामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा मुख्य प्रश्न सुटणार आहे. एकूण १६ किमी लांबीच्या या प्रकल्पांतर्गत २.२ किमी लांबीच्या चांदणी चौक इंटरचेंजचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-बंगलोर महामार्गाच्या दोन्ही बाजूंस २-लेन अंतर्गत आणि २-लेन बाह्य सेवेसाठी आहेत. एकाच इंटरचेंजमधून वेगवेगळ्या ८ दिशांना जाण्यासाठी एकूण ८ रॅम्प बनवण्यात आले आहेत, जे विविध भागांना मजबूत कनेक्टिव्हिटी देतील.
या संपूर्ण प्रकल्पात एकूण ४ उड्डाणपुल, १ अंडरपासचे रुंदीकरण आणि २ नवीन अंडरपास बांधण्यात आले आहेत. वाहतूकीसाठी संपूर्णपणे तयार असलेल्या या प्रकल्पामुळे चांदणी चौक परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे विणले जाईल. शहरातील अत्यंत गजबजलेल्या चौकातील रस्त्यांचा एकात्मिक विकास होईल. उड्डाणपूल आणि सर्व्हिस रस्त्यांमुळे प्रमुख रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल.
राष्ट्रीय महामार्ग ६० वरील खेड-सिन्नर सेक्शनमधील १४ किमी लांबीच्या व ४९५ कोटी रुपए किंमतीच्या खेड-मंचर बायपासच्या चौपदरीकरण प्रकल्पाचे देखील आज लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रकल्पात ६.६४ किमी लांबीचा सर्व्हिस रोड, एक मुख्य पुल, ९ छोटे पुल, १ उड्डाणपुल, ५ पादचारी अंडरपास, १ व्हेईक्युलर ओव्हरपास, ३ लाईट व्हेईक्युलर अंडरपास, ७ मोठे जंक्शन, १० मायनर जंक्शन तसेच ६ बसस्थानके यांचा समावेश आहे. तसेच खेड आणि मंचर येथील सुरळीत रहदारीसाठी बाह्यवळण रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्ते प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाचा वेळ १.३० तासांनी कमी होईल, ज्यामुळे वेळेची व इंधनाची बचत होईल. पर्यटन तसेच धार्मिक स्थळांना पोहोचणे सुलभ होईल. तसेच खेड व मंचर शहरांना ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल. कृषी उत्पादन आणि स्थानिक उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक पट्ट्यातील सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास देखील गडकरी त्यांनी व्यक्त केला.