शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस सिंहासारखं जगल्यास आयुष्य सार्थकी लागतं, या उक्तीचा दाखला देत विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते आणि शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी नितीश कुमारांचं कौतुक केलं. बिहारच्या राजकीय हालचालींवर भाष्य करताना अंबादास दानवे म्हणाले, भाजपाच्या दबावापुढे न झुकता एनडीएतून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा अत्यंत स्वाभिमानाचा निर्णय आहे.
तसलेच भाजपाच्या या दमननीतीचा एक दिवस भारतात विस्फोट होईल, असा इशारादेखील अंबादास दानवे यांनी दिला. औरंगाबाद येथील विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पद मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेने त्यांच्या नावाची शिफारस विधान परिषद उपाध्यक्षांसमोर केली आहे. तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून दानवेंनी जोरदार टीका केली.
बिहारमधील राजकीय स्थित्यंतरानंतर अंबादास दानवे यांनी नितीश कुमारांचं कौतुक केलं. ते म्हणाले, आपल्या भागातील एका दैनिकाचं छान ब्रीदवाक्य आहे. शेळी म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा, सिंह म्हणून एक दिवस जगणं सार्थकी लागतं.. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वाटत असेल, की आपण शेळी म्हणून जगत आहोत, तर त्यांनी एक दिवस सिंह म्हणून जगण्याचा स्वाभिमानाचा निर्णय घेतला असावा… तो योग्यच आहे, असं वक्तव्य दानवेंनी केलं आहे.