बिहारच्या राजकारणात मंगळवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. राजीनाम्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर भाजपवर गंभीर आरोप केले. यावर भाजपचे नेते आणि राज्यसभेचे सदस्य सुशील कुमार मोदी यांनी उत्तर देत भाजप जदयूला तोडू इच्छित होतं हे खोटं आहे. भाजप २०२४ मध्ये प्रचंड बहुमतानं निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भाजपनं इंग्रजांचं धोरण अवलंबलेलं आहे. ज्या शिडीवरून वर चढतात त्यालाच लाथ मारणं ही त्यांची कार्यपद्धती आहे. तसाच तिकडे नितीश कुमारांचा छळवाद होत होता, जसा आमचा इथे होत होता, असा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात ठेच लागली तिकडे नितीश कुमार शहाणे झाले, असंही सावंत म्हणाले.
“धोका देण्याचा पायंडा, ज्यांच्यात तो दुर्गुण आहे, तो भारतीय जनता पार्टीत किती मजबूतीनं आहे याची उदाहरणं काश्मीरपासून हरयाणापर्यंत, नितीश कुमारांपर्यंत सर्वत्र मिळतील. पाठीत सुरा खुपसण्यात कोण माहिर आहे? महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचं काय झालं, घात कोणी केला. हे मोदी वगैरे काल जन्मालाआले आहेत. त्यांना महाराष्ट्राविषयी काय माहित आहे,” असा सवालही अरविंद सावंत यांनी केला. मुफ्ती मोहम्मद यांच्यासोबत जाताना कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला? हिंदुत्वाच्या, कलम ३७० च्या की काश्मीरमधील हिंदू बांधवांच्या? असं त्यांनी नमूद केलं