ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे खळबळ उडाली असून थोरात यांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जे कुटुंब १०० वर्षांपासून काँग्रेससोबत एकत्र होतं, त्याच्यावर ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करावे, असा सल्ला तांबे यांनी दिला आहे. विधान परिषद पदवीधर निवडणुकीमुळे बाळासाहेब थोरात कमालीचे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत काम करू शकत नाही, असं स्पष्टपणे बोलून दाखवलं. आज त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिला.
त्यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस नेते दुखावले गेले आहे. बाळासाहेब थोरात यांच्याशी माझा कुठलाही संपर्क झालेला नाही. थोरात साहेबांनी जर पत्र लिहिलं असेल तर १०० वर्ष एकनिष्ठ राहिलेल्या परिवारावर ही वेळ का येत आहे. यावर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं परखड मत सत्यजीत तांबेंनी व्यक्त केलं. काँग्रेसमध्ये गट वगैरे असतील असं मला वाटत नाही. मला जे बोलायचं होतं ते मी पत्रकार परिषदेत सविस्तर मुद्दे घेऊन बोललो. मी माझी भूमिका पुराव्यानिशी मांडली आहे त्यामुळे मला आता काही बोलायचं नाही. बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या माणसावर ही वेळ येते तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असा सल्लाच तांबेंनी दिला.
तर, साहेबांची माझ्याबरोबर तशी काही चर्चा नाही साहेब जेव्हा व्यक्त होतात तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाईट वाटतं मात्र यावरती मी काही बोलू शकत नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी राजीनाम्याच्या प्रश्नांवर बोलण टाळलं. बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही दुर्दैवी बाब असल्याचे मत अशोक चव्हाण यांनी मांडले आहे. चव्हाणयांनी ‘सकाळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. हा वाद मिटवण्यासाठी त्यांची मनधरणी करणार आहे. पण बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली.