अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नकुसान झालं आहे. मात्र अद्याप राज्य सरकारकडून या नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. शेतकऱ्यांचं नुकसान झालं असताना सरकारचे मंत्री मात्र सभा घेण्यात व्यस्त आहेत. त्याचं शेतकऱ्यांकडे थोडेही लक्ष नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज चर्चा होणार आहे. तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन तसेच जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी अंबादास दानवेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अवकाळी पावसामुळं राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या पिकांचं फार मोठं नुकसान झालं आहे. मी स्वत: राज्यभर या नुकसानीची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांची फार वाईट परिस्थिती असल्याचे अंहाजास दानवे म्हणाले. अद्यापही नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. सरकारचे मंत्री सभा घेण्यासाठी व्यस्त आहेत. शेतकऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही. आम्ही या विरोधात आजही आवाज उठवू असे दानवे म्हणाले. आस्मानी संकटाबरोबर शेतकरी सुलतानी संकटात सापडला असल्याचे दानवे म्हणाले.