Latest Marathi News

BREAKING NEWS

७ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आधारशी ई-केवायसी करा; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

0

सोलापूर |

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात ई-केवायसी झाली नाही. यामुळे मुख्य सचिव यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत आधार क्रमांकाला ई केवायसी करून घ्यावी, अन्यथा संबंधित शेतकऱ्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. १२ वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

कृषी, सर्व तहसीलदार, तलाठी, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची बँक खाते पडताळणी केलेल्या आधार क्रमांकाशी जोडून घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच शेतकऱ्यांना ई-केवायसीबाबत मार्गदर्शन करावे. पी.एम. किसान योजनेअंतर्गत सप्टेंबर २०२२ पासून वितरीत केले जाणारे हप्ते आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सीएससी सेंटर, आपले सेवा केंद्रामध्ये जावून किंवा शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईलवर ई-केवायसी करावी.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार योजनेतील लाभार्थ्यांचा डाटा अंतिम व सुनिश्चित करण्याची कार्यवाही विहित कालमर्यादेत पूर्ण करायची आहे. सर्व पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील किंवा जवळील सीएससी सेंटर, आपले सेवा केंद्र किंवा स्वत:च्या मोबाईलवर ई-केवायसी करावी, असे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.