समाजकंटकांनी घेतले अनेक जलचर प्राण्यांचे प्राण : प्राणीमित्र आक्रमक ; प्राणीमित्रांचा आंदोलनाचा ईशारा…
बार्शी |
येथील कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा संस्थापित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या आवारातील चौकोनी विहिरीमध्ये, बाराही महिने पाणी असल्यामुळे, शहरातील विविध भागातील काही प्राणी मित्रांनी विविध प्रकारचे मासे विहिरीमध्ये आणून सोडले होते. विहिरीच्या शेजारी असलेल्या वडाच्या झाडावरती अनेक खारुताईंचे पण वास्तव्य आहे. बार्शीतील काही प्राणी मित्र दररोज सकाळी विहिरीतील माशांसाठी व खारुताईंसाठी खाऊ घेऊन येत असतात.
नेहमीप्रमाणे प्राणी मित्र अक्षय बारंगुळे, अभिजीत शिंदे व त्यांचे सहकारी माशांना व खारुताईंना खाऊ घेऊन आले असता, सदरील विहिरीमध्ये काही समाजकंटकांनी भरपूर प्रमाणामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्याचे दिसून आले. त्या ब्लिचिंग पावडरच्या अति प्रमाणामुळे पाण्यातील मास्यांसह सर्व जीवजंतू मृत पावले असून, मृत पावलेले मासे पाण्यावरती तरंगताना दिसून येत आहेत. ब्लिचिंग पावडरच्या अतिवापरामुळे व मरण पावलेल्या माशांमुळे विहिरीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आवारातील होणाऱ्या घटनेवर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष नाही का ? ज्या लोकांनी हे अघोरी कृत्य केलं, त्या लोकांवर कारवाई होणार का ? प्राणी मित्रांच्या भावनांचा आदर केला जाणार का ? असे अनेक प्रश्न प्राणी मित्रांकडून उपस्थित केले जात आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरील घटनेची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर संस्थेने कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उपस्थित प्राणी मित्रांनी दिला आहे.