मुंबई | सकाळ समूहाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री होण्यासाठी आत्ताही दावा करू शकतो, असे मोठे विधान त्यांनी केले. अजित पवारांच्या या विधानानंतर सत्ताधारी नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. हस्तचत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवारांकडे 145 आमदार असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. मी मुख्यमंत्री बनतो, असं सारखं म्हणायची काही गरज नाही. खरं तर आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत, खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू झाला, महागाईमुळे जनता त्रासली आहे, बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
अजित पवारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने काम केल्याचे विधान केले होते. यावर नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “अजित पवारांनी त्यावेळी शपथच घ्यायला नको होती. उपमुख्यमंत्री पदावर बसून खदखद निर्माण करण्यापेक्षा बाहेर राहून खदखद व्यक्त करायला हवी होती. मुळात असं वक्तव्य करणं चुकीच आहे. काही गोष्टी आवडल्या नाहीत तर त्याचवेळी त्यांनी बोलायला हवं होतं”, असंही पटोले यावेळी म्हणाले.