मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा धक्का बसला असून यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी शविसेना भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढणार आहेत. या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
दरम्यान आदित्य ठाकरेंच्या या यात्रेला 8 जुलैपासून अर्थातच आजपासून सुरुवात होणार आहे. यात आदित्य ठाकरे गटप्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटून शक्तिप्रदर्शन करतील. याद्वारे शिवसेना पुनर्बांधनीस सुरुवात केली जाणार आहे. या यात्रेत पुन्हा एकदा शिवसेनेला उभारी देण्याचे काम आदित्य ठाकरे करणार आहे.
मात्र शिवसेनेला त्यापूर्वीच अजून एक मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी ठाणे महापालिकेतील ६७ पैकी ६६ शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे ठाणे महापालिकेवरील नियंत्रण पूर्णपणे संपले असल्याचे म्हटले जात आहे. त्यात दुसरे म्हणजे शिंदे गट लवकरच शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर देखील दावा करणार असल्याचे म्हटले जात आहे.