आम्ही अडीच वर्षांपूर्वी केलेली चूक आता दुरुस्त केली आहे आणि याचा फायदा नक्कीच राज्याला होईल, असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता महाविकास आघाडी सरकारला काढला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निमित्त होते सोमवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे.
महामंडळाला हीरक महोत्सवाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले, आपण साठ वर्षे हा कारभार करीत आहात. राज्याच्या विकासात योगदान देत आहात. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे आणि हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशिवाय शक्यच होऊ शकत नाही.
तसेच वागळे इस्टेट येथून हे महामंडळ सुरू झाले. माझा मतदारसंघ वागळे इस्टेट आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात येथून झाली. आता येथे आयटी पार्क उभे राहत आहे. संपूर्ण राज्यात उद्योग यावेत म्हणून आपण प्रयत्न करीत आहात ही चांगली गोष्ट आहे. आपले सरकार लोकाभिमुख काम करणारे सरकार आहे. आपण उद्योग क्षेत्राला चालना देणार आहोत.