कोल्हापूर | शिवाजी विद्यापीठात १६ फेब्रुवारीला दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आमंत्रित करण्यात आले. मात्र, ठाकरे गटाकडून याला विरोध होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराच ठाकरे गटाने दिला आहे. या संदर्भातील इशारा कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय पवार आणि विजय देवाने यांनी दिला आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधी केलं होत याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राज्यपालांविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून शिवाजी विद्यापीठाच्या गेटवर जेलभरो आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातून ठाकरे गटाच्या वतीने विविध घोषणाबाजी करण्यात येत आहे. राज्यपाल कोश्यारी चले जाव ! राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी, आधी माफी मागा अन् मगच कोल्हापुरात पाय ठेवा, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शिवाजी विद्यापीठाने दीक्षांत समारंभासाठी निमंत्रित केले. राज्यपाल कोश्यारी हे वारंवार आणि जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. कोल्हापुरात शिवरायांच्या नावाने असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास त्यांना निमंत्रित करून विद्यापीठ प्रशासनाने कोल्हापूरमधील जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. ते जनता कदापी सहन करणार नाही. त्यामुळे कोल्हापुरात येण्यापूर्वी राज्यपाल कोश्यारी यांनी माफी मागावी, अशी मागणीही ठाकरे गटाने केली आहे.