राज्यातल्या कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक
मुंबई |
राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांच्या माल कवडीमोल दाराने विकला जात आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्य सरकारने यावर तातडीने हस्तक्षेप करुन नाफेड सारख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्याव्यात तसेच केंद्र सरकारशी समन्वय साधून हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला.
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासंबंधी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र हे भारतातील मोठ्या प्रमाणावर कांदे पिकवणारे राज्य आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा 33 टक्के वाटा असून कांदाची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये सुध्दा महाराष्ट्र अग्रेसर आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी फक्त 500 ते 600 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला असून कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे. कांद्याच्या दराबाबत शासनाविरोधात राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली जात आहेत.
कांद्या बरोबरच कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्षाच्या पिकाला बाजारभावात उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रंचड मोठे आर्थिक नुकसान होत आहे. कांदा पिक विक्रीनंतर बार्शी जि.सोलापूर येथील शेतकऱ्यांला 2 रुपयांचा धनादेश देण्यात आला असून ही शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच आहे. कांदा निर्यातीकरिता केंद्र शासनाने यापूर्वी लागू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरु करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. नाफेड तसेच मार्केटिंग फेडरेशनमार्फंत सुध्दा कांदा खरेदी सुरु करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.