पुणे|
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ दादावाडी येथील सभागृहात भाजप जैन प्रकोष्ठ आणि भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी मेळावा आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , पर्यटन व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार माधुरी मिसाळ , उमेदवार हेमंत रासने यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की भाजप हा व्यापाऱ्यांची पार्टी म्हणून हिणवले जात होते. काँग्रेसने एलबीटी करप्रणाली आणली. हा कर जाचक होता, तो २०१४ मध्ये भाजप सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बंद करून व्हॅट कर प्रणाली आणली. त्यात व्यापाऱ्यांना अनेक योजनांचा फायदा मिळवून दिला. आता, केंद्र सरकारने जीएसटी प्रणाली आणून त्यातही अजून सुटसुटीतपणा आणला. कसबा पेठ मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असून, आतापर्यंत सर्वाधिक मताधिक्य 43 हजारांचे आहे, ते आता वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
मंगल प्रसाद लोढा म्हणाले, की दहा वर्षांपूर्वी भारताची स्थिती काय होती? आपल्याला हिणवले जात होतं, परंतु नरेंद्र मोदी यांचे सरकार आले तेव्हापासून परीस्थिती बदलली आहे, काँग्रेसने ७०वर्षात व्यापाऱ्यांसाठी काय केलं या सगळ्याचा विचार करून रासने यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.या मेळाव्याला राजेश सांकला, महेंद्र पितळीया, विजय भंडारी, महेंद्र व्यास, महेंद्र शिंदे, प्रकाश बाफना, राजेश शहा, उत्तम भाटिया व अनेक व्यापारी उपस्थित होते.