जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला – चंद्रकांत पाटील
नागपूर |
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये २४८२ ग्रामपंचायती जिंकून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नंबर वन ठरली आहे. भाजपा – बाळासाहेबांची शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा मतदारांनी युतीला कौल दिला आहे. उपलब्ध आकडेवारी ध्यानात घेता भाजपाचा दणदणीत विजय झाल्याचे दिसते. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला ८४२ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. या विजयावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त करत सर्व विजयी उमेदवारांचे अभिनदंन केले आहे.
भाजपच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, जनतेने भाजपावरच पुन्हा विश्वास दाखवलाय. जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. राज्यातील गावखेड्यांच्या विकासासाठी भाजपा सदैव तत्पर आहे. हा विजय मतदार बंधू-भगिनींमुळेच साकार झाला, त्यांचे आभार! सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन!, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सर्वाधिक २३४८ जागा जिंकून भाजप पुन्हा एकदा क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना यांनी ८४२ जागा जिंकल्या आहेत. तर याउलट उद्धव ठाकरे गटाला केवळ ६३७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस १२८७ जागा तर काँग्रेसने ८०९ जागा जिंकल्या आहेत. इतर १२८१ जागा मिळवल्या आहेत.