मुंबई |
एका वर्षानंतर नक्कीच आम्ही सत्तेत असणार आहोत असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केला आहे. अमित ठाकरे यांनी आज सकाळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची रामटेक निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. शिक्षणमंत्र्यांची भेट घेत त्यांनी शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत २५ टक्के राखीव जागांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडून या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे.
अमित ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना असे सांगितले की, एक वर्षानंतर नक्कीच आम्ही सत्तेत असणारं अहोत. आत्ता सत्तेत जायचं की नाही हे राज ठाकरे ठरवतील. सध्या राज्याला स्थिर सरकारची गरज आहे. आत्ता माझ्या दृष्टीने राजकिय प्रश्न नाही तर लोकांचे प्रश्न गरजेचं आहेत. ‘ अमित ठाकरेंच्या या मोठ्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनीसुद्धा आपल्या भाषणात हे सर्व प्रश्न लवकरच दूर होतील आणि आपण सत्तेत असू असे म्हटले होते.
अमित ठाकरे यांनी पुढे सांगितले की शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार २५ टक्के प्रवेश दिले जातात. तब्बल १८०० कोटी रुपये सरकारने शाळांना देणे बाकी आहे. त्यामुळे संस्थांना प्रवेश देणे परवडत नाही. याबाबत शिक्षणमंत्र्यांना अवगत केले आहे.
दरम्यान, ‘पुढील शैक्षणिक वर्षापासून RTE कायदाअंतर्गत पूर्व प्राथमिक वर्गांसाठी २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतील आणि लवकरात लवकर ज्या खासगी शाळांची प्रतिपूर्ती रक्कम थकीत आहे. ती लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न आम्ही करू असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अमित ठाकरे यांना दिले.